
मुंबई: महात्मा गांधींचा भूमिकेवर आम्हीही टीका केली, पण स्वातंत्र लढ्यात त्यांचं कार्य, कर्तृत्व, बलाढ्य ब्रिटीश सरकारला आव्हान देण्याचं काम गांधीजींनी केलं. पण गांधींचं नेतृत्व असामान्य आहे. गोळी झाडूनही गांधीजी मेले नाहीत. जर तुम्हाला गोळीच झाडायची होती तर ज्यांनी पाकिस्तान बनवला त्यांच्यावर झायाडची होती. खरा मर्द असता तर गांधींवर गोळी झाडली नसती, अशा शब्दांत शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला आहे.
खा. संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी संवाद साधला. आज महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे. राहुल गांधींनी ट्वीट करत आजच्याच दिवशी हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींची हत्या केली होती, असं म्हटलंय. यावर राऊत म्हणाले की, जर खरा हिंदुत्ववादी असता तर जिनाला गोळी मारली असती. गांधींना का गोळी मारली. पाकिस्तानची मागणी तर जिनांनी केली होती. मर्दानगी होती, तर गांधींना का मारलं, जिनांना का मारलं नाही, असा सवाल राऊतांनी केला. वेगळ्या पाकिस्तानची मागणी जिनांनी केली होती. जर गोळी मारणा खरा हिंदुत्वावादी होता आणि त्याच्यात हिंमत होती, तर फाळणीला कारणीभूत असलेल्या जिनांवर गोळी झाडायला हवी होती, निशस्त्र गांधींना का गोळी झाडण्यात आली होती. गांधींच्या काही भूमिकांवर टीका होऊ शकते, त्यांच्यावर होऊ शकत नाही, क्रांतीकारक म्हणून त्यांचं योगदान असामान्य होतं. कोणताही राष्ट्रभक्त गांधींवर गोळ्या झाडूच शकत नाही, असं राऊतांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या ७ उमेदवारांचे अर्ज बाद
उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यामुळं खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये आमच्या सात उमेदवारांचे नामांकन अर्ज बेकायदेशीरपणे रद्द केले. कागदपत्र योग्य दिली तरी सत्तेचा दुरूपयोग केला आहे. आमच्याकडे पुरावे आहेत. ते तीनच्या आधी तिथे पोहोचले होते, तरी देखील त्यांचे नामांकन रद्द केलं. जिल्हाधिकारी ऐकत नाहीत, दबावात काम करत आहेत, ते शिवसेनेला घाबरले आहेत. हे लोकशाही नाही. आम्ही याबद्दल आवाज उठवणार आहोत, असंही राऊत म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला. वेळेत अर्ज भरूनही तो रद्द केला गेला. निवडणूक अधिकारी, जिल्हा दंडाधिकारी या प्रकरणावर सुनावणी करण्यासही तयार नाहीत. हे सगळं भाजपच्या दबावामुळे होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. भाजपा शिवसेनेला घाबरते, म्हणून ते हे सगळं करताहेत. ही लोकशाही नाही, निवडणुका भीतीदायक नसाव्या, आमच्या उमेदवारांना धमकावलं जातंय. भाजपला आमच्या हिंदुत्वाची भीती आहे. पण आता ते जे करताहेत ते त्यांना भविष्यात नक्कीच महागात पडणार आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
यासंदर्भात मी दिल्लीत जाणार आहे, निवडणूक आयोगाकडे आम्ही ही मागणी करणार आहोत. निवडणुका चांगल्या वातावरणात व्हायला हव्यात. त्यांना भीती आहे. नव हिंदूत्ववादी उत्तर प्रदेशात निवडणुक लढतोय. गुड्डू पंडीत यांचाही अर्ज रद्द केला. अशाच प्रकारच्या चुका दाखवत अर्ज केलेल्यांचे अर्ज स्विकारले गेलेत. गोव्यात प्रमोद सावंत यांच्याबाबतीतही तेच झालं. कुणाला तरी आमची भीती वाटतेय. आमचे अर्ज रद्द करण्यात आलेत, असं राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले की, गृहमंत्र्यांनी गृहमंत्र्यांची भाषा बोलायला हवी. कायद्याचं राज्य नाही तर तुमची जबाबदारी आहे. शिवसेनेला उत्तर प्रदेशात पाय ठेवू द्यायचा नाही. ऐकलं नाही तर निवडणूक अधिकारी त्यांनी त्यांच्या अधिकारांचा बेकायदेशीर वापर केलाय. ही भीतीच आहे. हा ‘अंधा कानून’ आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे. राऊत म्हणाले की, आज भाजपच्या राज्यात शेतकऱ्यांना काय मिळतंय, नोकरदारांना काय मिळतं, जीएसटीचे राज्याचे पैसे परत द्या. राजकारणात लोकांना विसरण्याची सवय असते.
शिवसेना-भाजप एकत्र येणं शक्य नाही; राऊतांनी ‘रोखठोक’ ठणकावले
शिवसेना-भाजप भविष्यात एकत्र येण्याच्या चर्चा अधूनमधून सुरू असतात. या चर्चांना संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. शिवसेना-भाजप एकत्रं येणं शक्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २३ जानेवारीला केलेल्या भाषणाचे पडसाद जोरदार उमटत आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाबाबत ठाम भूमिका मांडली. त्यांच्या भाषणातून एक संदेश नक्की मिळाला तो म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची महाआघाडी हेच यापुढे महाराष्ट्राचे राजकीय भविष्य आहे व भारतीय जनता पक्षाशी ‘टेबलाखालून’ व्यवहार आणि बोलणी चालली आहेत, हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येतील या गप्पांना पूर्णविराम मिळाला आहे, असं रोखठोक विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातील रोखठोक या स्तंभातून ही भूमिका राऊत यांनी स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर अभद्र टीका करणाऱ्यांची तोंडे २३ जानेवारीस पूर्ण वाकडी झाली. उद्धव ठाकरे समोर आले व भाजपच्या मुखवट्यावरच हल्ला केला! उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने संभ्रम दूर झाला. शिवसेना आणि भाजपचे ‘आतून काही सुरू आहे’ या अफवांना पूर्णविराम मिळाला! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर भाजप नेत्यांनी खालच्या पातळीवर जाऊन विधाने केली होती. उद्धव ठाकरे कोठे आहेत? अशी शंका चंद्रकांत पाटील वगैरे नेत्यांनी उपस्थित केली. विरोधकांच्या सर्व ‘लघुशंका’ २३ जानेवारी रोजी त्यांच्यावरच उलटल्या, असा हल्ला राऊत यांनी चढवला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या मदतीशिवाय शिवसेनेची वाढ शक्यच नसल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. ही अतिशयोक्तीच म्हणायला हवी. शिवसेनेचा जन्म १९६६ सालातला. भारतीय जनता पक्षाने 1980 साली डोळे उघडले. त्यामुळे भाजपच्या मदतीने शिवसेना उभी राहिली आणि वाढली हा दावा चुकीचा आहे. कोण कोणाच्या आधी जन्मास आले यापेक्षा जन्मास येऊन काय दिवे लावले? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, असा हल्ला त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर चढवला.
उद्धव ठाकरे यांचे भाषण व त्यानंतर फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील संभ्रम पूर्णपणे दूर झाला. ठाकरे व त्यांचे काही नेते भारतीय जनता पक्षाशी आतून संधान बांधून आहेत व सध्याचे सरकार ही तात्पुरती व्यवस्था आहे हे मळभ दूर झाले. आता एकत्र येणे शक्य नाही व फडणवीस यांच्या कडक भाषेतील उत्तराने कोणतीही खिडकी उघडी आहे असे दिसत नाही. आहे त्या स्थितीतच राज्य पुढे चालवले जाईल व भारतीय जनता पक्षाचा बराचसा वेळ यापुढे राजभवनाच्या परिसरातच जाईल, असा चिमटाही त्यांनी काढला.




