‘माय होम इंडिया’चा वन इंडिया पुरस्कार एस कोशण्ट सुमेर यांना प्रदान

मुंबई : ‘माय होम इंडिया’ च्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा वन इंडिया पुरस्कार यंदा मेघालयातील सुप्रसिद्ध लेखक एस कोशण्ट सुमेर यांना ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा दादर पश्चिम येथील स्वातंत्र्य वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक या सभागृहात पार पडला. यावेळी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, ‘माय होम इंडिया’ संस्थेचे अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी, ‘माय होम इंडिया’चे सचिव सुहास सामंत, भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याचे प्रमुख वक्ते भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी आपाले मत व्यक्त करतांना सांगितलं की, स्वधर्म-स्वसंस्कृती आणि स्वभाषेसाठी झगडणारे एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून कोशण्ट सुमेर महान आहेत. मागील अनेक वर्षांपासून ईशान्य भारतातील राज्यांमध्ये देशविघातक शक्ती कार्य करत आहेत. अशा शक्तींना थोपविण्याचे काम आपल्या लिखाणातून करणारे कोशण्ट सुमेर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्यामुळे त्यांचा नव्हे, तर जणू पुरस्काराचाच सन्मान झाला आहे.
‘एवढ्या थोर व उत्तुंग व्यक्तिमत्वाचा सत्कार करताना मी भावविभोर झालो आहे. त्यांच्याविषयी बोलू तेवढे कमी आहे. त्यांचे कार्य थोर आणि महान आहे. त्यांच्या कार्याला शतश: नमन. असे गौरउद्गार ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक राजदत्त यांनी काढले. ते म्हणाले की ‘माय होम इंडिया’ ने ईशान्य भारतातील लोकांना उर्वरित भारतासोबत जोडणाऱ्या मोलाचे कार्य केले आहे. माय होम इंडिया चे योगदान नक्कीच उल्लेखनीय आहे.




