
नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या कारणावरुन गोंधळ सुरू होता. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच संसदेचे कामकाज नियोजित वेळेपूर्वी अनिश्चित काळासाठी तहकूब केले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. यातच आता लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज बुधवारी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. आज सभागृहाच्या कामकाजात पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते.
लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गदारोळ सुरू केला. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेतला. या गदारोळामुळे सभागृहाचे १८ तास ४८ मिनिटे वाया गेल्याचे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले. लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर काही वेळातच राज्यसभेचे कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. यासोबतच संसदेचे हिवाळी अधिवेशनही संपले.
सकाळी ११ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी आवश्यक कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवली. यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी एका वृत्तपत्राच्या वृत्ताचा संदर्भ देत अयोध्येशी संबंधित मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र नायडूंनी त्याला परवानगी दिली नाही. सभापतींनी खर्गे यांना मुद्दा मांडण्यासाठी नोटीस द्यायला हवी होती, असे सांगितले. यानंतर त्यांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले.
संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू झाले असून ते २३ डिसेंबरपर्यंत चालणार होते. मात्र, सभागृहातील गोंधळामुळे कामकाज एक दिवस अगोदर म्हणजेच २२ डिसेंबरलाच अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आणि अधिवेशनाची सांगता झाली. यावर आता विरोधकांची काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्वाचे आहे.
कोरोनाचा बूस्टर डोस कधी मिळणार? राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल
मागील दोन वर्षांपासून भारत कोरोना महामारीचा सामना करत आहे. लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, पण अद्याप सर्व लोकांचे लसीकरण झालेले नाही. यातच आता कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. या सर्व परिस्थितीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात लसीकरणाचे काम जोरात सुरू आहे. दुसरीकडे, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लसीकरणाच्या संथ प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून आपल्या देशातील बहुतांश लोकसंख्येला अजूनही लसीकरण झालेले नाही, असे म्हटले आहे. तसेच, बूस्टर डोस कधी मिळणार असा प्रश्नही विचारला आहे.




