
नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर हल्ला करण्यास आलेल्या पाकिस्तानी हवाई दलाला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या, पाकिस्तानी हवाई दलाचं अत्याधुनिक एफ-१६ विमान पाडणाऱ्या ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचा आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वीर चक्र देऊन गौरव केला. एफ-१६ जमीनदोस्त केल्यानंतर अभिनंदन यांचं विमानदेखील कोसळलं. त्यानंतर ते पाकिस्तानच्या हद्दीत सापडले. मात्र सुदैवानं त्यांची सुटका झाली आणि ते सुखरुप मायदेशी परतले.
फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामात दहशतवादी हल्ला झाला. त्याचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत जात होते. त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले. त्यात दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यानंतर संतापलेल्या पाकिस्तानी हवाई दलानं भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला. मात्र भारतीय हवाई दलानं त्यांना पिटाळून लावलं. याच दरम्यान विंग कमांडर अभिनंदन (आता ग्रुप कॅप्टन पदावर कार्यरत) पाकिस्तानचं एफ-१६ विमान जमीनदोस्त केलं. त्यानंतर त्यांचंही विमान कोसळलं. ते पाकव्याप्त काश्मीरमधील काही स्थानिकांच्या तावडीत सापडले. सुदैवानं त्यांची काही तासांमध्ये सुटका झाली.
बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो अभिनंदन वर्धमान यांना याच महिन्यात प्रमोशन मिळालं आहे. एअर स्ट्राईकच्यावेळी विंग कमांडर असलेल्या अभिनंदन वर्धमान यांना ग्रूप कॅप्टनची रँक देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या एफ-१६ या फायटर विमानांना प्रत्युत्तर देणाऱ्या अभिनंदन यांना याआधी शौर्य चक्र पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं आहे. अभिनंदन यांनी बालाकोट एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानला तोडीस तोड प्रत्युत्तर देत पाकचं अमेरिकन बनावटीचं एफ-१६ फायटर विमान पाडलं होतं. विशेष म्हणजे मिग-२१ विमानातून उड्डाण करणाऱ्या अभिनंदन यांनी एफ-१६ जमीनदोस्त केलं. मिग-२१ च्या तुलनेत एफ-१६ अत्याधुनिक मानलं जातं. मात्र अभिनंदन यांनी मिग-२१ च्या मदतीनं एफ-१६ पाडत पाकिस्तानी हवाई दलाला दणका दिला.




