
पाटणा: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता तसेच अलीकडेच काँग्रेसमध्ये सामील झालेल्या कन्हैय्या कुमार बिहारमध्ये दोन जागांवर होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत. बिहारमधील कुशेश्वरस्थान आणि तारापूर येथे पोटनिवडणुका होत आहेत. यावेळी एका प्रचारसभेला संबोधित करताना कन्हैय्या कुमारने बिहारमधील नितीश कुमार सरकारवर जोरदार टीका केली असून, बिहारच्या लोकांना हनिमूनसाठीही दुसऱ्या राज्यांत जावे लागते, असा खोचक टोला लगावला आहे.
तारापूर येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून राजेश कुमार मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कन्हैय्या कुमार काँग्रेसचे उमेदवार राजेश कुमार मिश्रा यांच्या प्रचारार्थ तारापूर येथे गेले होते. यावेळी त्यांनी नितीश कुमार सरकारवर जोरदार टीका केली. कुशेश्वरस्थान आणि तारापूर या दोन्ही जागांसाठीच्या पोटनिवडणुका ३० ऑक्टोबर रोजी होणार आहेत.
बिहारमधील नागरिकांना नोकरी, शिक्षण, उपचार केवळ यांसाठी नव्हे तर हनीमूनसाठीही दुसऱ्या राज्यात जावे लागते. बिहारमध्ये विस्थापितांचा प्रश्न खूप मोठा आहे. तसेच बिहारमध्ये विकास कुठेच दिसत नाही, अशी टीका कन्हैय्या कुमारने केली आहे. काँग्रेस आणि आरजेडी स्वबळावर निवडणूक लढत आहे. याबाबत बोलताना कन्हैय्या कुमारने सांगितले की, काँग्रेस हा खूप मोठा पक्ष आहे. मोठ्या पक्षासाठी मन मोठे आणि खुले ठेवायला हवे. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही. जनतेचा पाठिंबा महत्त्वाचा असतो, असे कन्हैय्या कुमारने म्हटले आहे.
दरम्यान, हल्लीच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कन्हैया कुमारने भाजपावर जोरदार टीका केली. भाजपा आणि उजवी मंडळी ज्या तुकडे-तुकडे घोषणेवरून कन्हैयावर टीका करत असे, त्याच तुकडे तुकडे घोषणेचा आधार घेत कन्हैयाने भाजपला टोला लगावला आहे. आता आम्ही भगवा पार्टीचे तुकडे तुकडे करणार असा इशारा कन्हैया कुमारने दिला.




