
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशावर शंका उपस्थित करुन कायदेशीर खुलासा मागितला आहे. यामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल आमने-सामने आहेत. परंतु मला राज्यपालांवर विश्वास आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशावर ते सही करतील असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. राज्यपालांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. त्यांना जर काही प्रश्न असतील तर राज्य सरकार त्यामध्ये सुधारणा करुन पुन्हा प्रस्ताव पाठवेल असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटत असतात ते सुद्धा नक्की पाठपुरावा करतील असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
भुजबळ यांनी म्हटलं आहे की, माझा राज्यपालांवर पूर्णपणे विश्वास आहे. त्यांना काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांवर उत्तर देण्याचं आमचं काम आहे. राज्यपाल निश्चितपणे अध्यादेशावर सही करतील त्याच्यामध्ये राजकारण येण्याचे काही कारण नाही. राज्यपाह तसे नाहीत असा माझा विश्वास असल्याचेही भुजबळ यांनी म्हटलं आहे. राज्यपालांना काही त्रुटी असतील तर त्यांना पुन्हा दुरुस्ती करुन ओबीसी आरक्षणासंदर्भात अध्यादेश पाठवू असेही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच विरोधकांना राज्यपालांकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन करणार का? असा प्रश्न भुजबळ यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुद्धा ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाच्या समर्थनार्थ आहेत. फडणवीस राज्यपालांकडे पाठपुरावा करतील असेही भुजबळ यांनी म्हटलं आहे.




