तुम्ही मोदी सरकारलाही देशविरोधी म्हणणार का?; रघुराम राजन यांची आरएसएसला विचारणा

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून काही विषयांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएस आणि भाजप यांच्यावर निशाणा साधला जात आहे. गीतकार, कवी, संवादलेखक जावेद अख्तर यांनी आरएसएसवर केलेल्या टीकेमुळे आरोप-प्रत्यारोप सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक मुखपत्र असणाऱ्या ‘पांचजन्य’मधून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या ‘इन्फोसिस’वर करण्यात आलेल्या टीकेमुळे यात भर पडली होती. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी टीकास्त्र सोडत, कोरोना लसीकरणाच्या बाबतीत सुरुवातीच्या काळामध्ये केलेल्या वाईट कामागिरीसाठी तुम्ही केंद्र सरकारला देशविरोधी म्हणणार का, अशी थेट विचारणा केली आहे.
‘इन्फोसिस’ कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक ‘पांचजन्य’ या साप्ताहिकामध्ये व्यक्त करण्यात आली होती. वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने ही टीका करण्यात आली होती. यावर रघुराम राजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत निशाणा साधला आहे.
हे वक्तव्य काहीच कामाचे नाही, असे मला वाटते. कोरोना लसीकरणाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये चांगले काम न करणाऱ्या सरकारला तुम्ही दोष देत देशविरोधी म्हणणार का? तुम्ही त्याचा चूक म्हणता आणि लोक चुका करत असतात, असे राजन यांनी म्हटले आहे. जीएसटी हे त्याचे उदाहरण असल्याचे सांगत जीएसटीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मला फार योग्य वाटला नाही. ते अजून चांगल्या पद्धतीने करता आले असते. मात्र या चुकांमधून शिकले पाहिजे. त्यांचा वापर तुमचे जुने हेवे दावे काढण्यासाठी होता कामा नये, अशी टीका रघुराम राजन यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीवेळी केली.
दरम्यान, ‘इन्फोसिस’ने अनेकदा नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचे आरोप आहेत. मात्र त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत, असेही ‘पांचजन्य’मधील लेखात म्हटले होते. वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने ही टीका करण्यात आली. ही दोन्ही पोर्टल इन्फोसिस या अव्वल भारतीय तंत्रज्ञान कंपनीने तयार केली आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला मुद्दामहून अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असा आरोप पांचजन्यच्या ताज्या अंकात करण्यात आला होता.




