
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. भुजबळ यांच्यासह एकूण सहा जणांना न्यायालयाने दोषमुक्त केलं आहे. छगन भुजबळ, समीर भुजबळ, समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, संजय जोशी, गीता जोशी यांना दोषमुक्त करण्यात आलं आहे.
छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या काळात महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. विविध कंत्राटाच्या माध्यमातून छगन भुजबळांना लाखो रुपये लाच म्हणून देण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणी सक्तवसुली संचलनालयानेही छगन भुजबळांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी भुजबळ यांना दोन वर्षांची जेलवारीदेखील झाली होती. पण, आता या प्रकरणी सत्र न्यायालयाने छगन भुजबळांना दोषमुक्त केल्याने त्यांना हा एक मोठा दिलासा आहे.
छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना सत्र न्यायालयाकडून महाराष्ट्र सदन प्रकरणात दिलासा मिळाला आहे. या निर्णयाला मी हाय कोर्टात चॅलेंज करणार आहे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, सुरुवातीपासूनच या प्रकरणात आक्रमक असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार आहेत. दमानिया यांनी एक ट्विट करत हायकोर्टात दाद मागणार असल्याचं सांगितलं आहे.




