
लंडन : लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळालं. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांच्या दमदार खेळीवर दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी पाणी फिरवले अन् बघताबघता ८ फलंदाज अवघ्या ९७ धावांवर माघारी परतले. जेम्स अँडरसननं पाच विकेट्स घेत विक्रमांना गवसणी घातली. त्यामुळे भारताचा पहिला डाव ३६४ धावांत संपुष्टात आला. प्रत्युत्तरात इंग्लंडलाही दोन धक्के बसले, परंतु कर्णधार जो रूट व सलामवीर रोरी बर्न्स यांनी भारतीय गोलंदाजांची कसोटी पाहिली. बर्न्स ४९ धावांवर माघारी परतला असला तरी इंग्लंडनं आजच्या दिवसात वर्चस्व गाजवले. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं ३ बाद ११९ धावा केल्या आणि आणखी ते २२५ धावांनी पिछाडीवर आहेत. रूट ४९ धावांवर खेळत आहे.
पहिल्या दिवसाच्या ३ बाद २७६ धावांवरून आज डावाची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला पहिल्याच षटकात धक्का बसला. लोकेशनं २५० चेंडूंत १२ चौकार व १ षटकार खेचून १२९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणेला ( १) जेम्स अँडरसननं पुढील षटकाच्या पहिल्याच चेंडूवर माघारी पाठवले. रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला होता. पंत ३७ धावांवर झेलबाद झाला. जडेजा ४० धावांवर बाद झाला. भारताचा पहिला डाव ३६४ धावांवर संपुष्टात आला. अँडरसननं ६२ धावांत पाच विकेट्स घेतल्या. मार्क वूड व ऑली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. डॉम सिब्ली ( ११) व हसीब हमीद ( ०) यांना सिराजनं सलग दोन चेंडूंत माघारी पाठवले. मोहम्मद सिराजनं सलग दोन चेंडूवर धक्के दिले. रोरी बर्न्स व कर्णधार जो रूट यांनी इंग्लंडचा डाव सावरला. भारताविरुद्ध कसोटीत २००० धावा करणाऱ्या दुसऱ्या इंग्लिश फलंदाजाचा मान यावेळी रुटनं पटकावला. माजी कर्णधार अॅलिस्टर कूक २४३१ धावांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर रूट (२०००*) आणि ग्रॅहम गूच ( १७२५) यांचा क्रमांक येतो.
दिवसाचा खेळ संपण्यास ११ षटकांचा खेळ शिल्लक करताना मोहम्मद शमीनं भारताला मोठं यश मिळवून दिलं. त्यानं बर्न्स-रूट यांची १६४ चेंडूंवरील ८५ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. बर्न्स १३६ चेंडूंत ७ चौकारांसह ४९ धावांवर पायचीत झाला.




