हरिद्वारमध्ये गंगा स्नानासाठी उतरलेल्या मुंबईतील तीन विद्यार्थिनींचा मृत्यू

मुंबई : हरिद्वारमध्ये गंगा नदीत स्नान करण्यासाठी उतरलेल्या मुंबईतील तीन विद्यार्थिनी वाहून गेल्याची दुर्घटना उघडकीस आली आहे. गंगेच्या खोल पाण्यात उतरलेल्या तिघी युवती नदीच्या प्रवाहामुळे वाहून गेल्याची माहिती आहे. अद्याप तिघींचाही शोध लागलेला नाही.
वैद्यकीय शिक्षण घेणारे मुंबईतील पाच जण उत्तराखंडला गेले होते. यातील तीन विद्यार्थिनी हरिद्वारमध्ये गंगा नदीत वाहून गेल्या. या घटनेमुळे त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. मुंबईच्या विविध भागात राहणाऱ्या पाच मित्र-मैत्रिणींचा ग्रुप ३० जुलै रोजी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे पिकनिकसाठी गेला होता. कांदिवली, बोरिवली आणि मीरा रोड परिसरात राहणाऱ्या या पाच जणांमध्ये ४ मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.
हे सर्व जण बुधवारी दुपारी दोन वाजता गंगा नदीत स्नान करण्यासाठी उतरले होते. त्यांनी पैशाचे नाणे नदीत टाकले. त्यानंतर करण मिश्रा आणि एक युवती पाण्यातून बाहेर आले, पण इतर तिघी जणी आणखी खोल पाण्यात गेल्याचं सांगितलं जातं. मात्र गंगा नदीच्या पाण्याला प्रचंड प्रवाह असल्यामुळे या मुली पाण्यासोबत वाहून गेल्या. गंगा नदीत उतरल्याच्या वेळी एकीने त्यांचा पहिला व्हिडीओ काढला होता. यामध्ये त्या तिघीही मुली पाण्यात डुंबताना दिसत आहेत.
ही माहिती ते सर्व जण जिथे थांबले होते, त्या हॉटेल चालकाला दिली. त्यानंतर स्थानिक पोलिसांना याविषयी सांगण्यात आले. तातडीने शोध कार्य सुरु करण्यात आले, मात्र सहा तास शोध घेऊनही या तिन्ही मुली सापडल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.




