
मुंबई : ठाकरे मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मंत्र्यांच्या कामगिरीच्या आधारावर दोघांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर एका राज्यमंत्र्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून नारळ मिळण्याची शक्यता असून यातील एक मंत्री आदिवासी भागातील असून दुसरा मुंबईतील असल्याचं सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असल्यामुळे काही मंत्री आणि कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. यामुळे शिवसेनेच्या आमदारांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रारी आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार करण्यात आला आहे. आता राज्यातही राज्यमंत्रिमंडळात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातील काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना राज्यमंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. यातील एक मंत्री हे ग्रामीण आणि आदिवासी भागातील असून त्यांच्या कामगीरीबाबत केंद्रामध्ये आणि राज्यात चर्चा सुरु असून बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. हे मंत्री राष्ट्रवादीच्या अधीन राहून काम करत असल्याचं दिसत असल्यामुळे त्यांना हटवण्यात येऊ शकते तर दुसरे मंत्री हे मुंबईतले आहेत. तसेच एका राज्यमंत्र्याचे काम चांगलं असल्यामुळे त्यांना बढती देण्यात येणार असून त्यांना कॅबिनेटचा दर्जा देण्यात येऊ शकते.
काँग्रेसच्या या मंत्र्यांच्या बदलाबाबत दिल्लीत चर्चा सुरु आहे. परंतु येत्या काही दिवसांत हे बदल होण्याची शक्यता आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेसमध्ये बदलाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत तेव्हा असे सांगण्यात येते की नाना पटोले यांना मंत्रिपद देण्यात येईल, परंतु काँग्रेसच्या नेतृत्वाला नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष राहून पक्षासाठी पूर्ण वेळ काम करावं अशी अपेक्षा आहे. काँग्रेस नेतृत्व नानांना मंत्रिपद देण्यास फारसं अनुकूल नाही. नानांकडे सध्या पक्षवाढीची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी त्यासाठी पूर्णवेळ काम करावं, अशी नेतृत्वाची इच्छा आहे. पक्षातील संतुलन विचार घेऊन लवकरच याबद्दलचा निर्णय होईल.




