पोलीस भरतीसंदर्भात राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात हजारो पदांची भरती केली जाणार असून, गृह विभागाकडून शासन आदेश जारी केलाय. शासन निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून ५ जुलै २०२१ रोजी सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आरक्षणाच्या अनुषंगानं धोरणात्मक बाबींचा निर्णय असल्यानं तो गृह विभागांतर्गत पोलीस भरतीसाठी लागू करणे आवश्यक आहे.
सदर शासन निर्णय गृह विभागाकडून रद्द करण्यात येत असून, पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह शिपाई आणि राज्य राखीव पोलीस बल शिपाई भरती प्रक्रिया २०१९ सामान्य प्रशासन विभागाच्या ५ जुलै २०२१ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार राबवण्यात येणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी पोलीस महासंचालक यांनी तत्काळ करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, असंही जीआरमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलात एकूण १२ हजार २०० पदांची भरती केली जाईल, अशी घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी दिलीप वळसे पाटलांनी केली होती. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थिती ३१ डिसेंबरपूर्वी ५२०० पदांची भरती करणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने ७ हजार पदे भरली जातील, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती.




