माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रम

पुणे : माजी केंद्रीय मंत्री आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुबोध मोहिते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. शरद पवार यांच्या उपस्थितीत सुबोध मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. मोहिते यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग खात्याचे मंत्री म्हणून कामकाज पाहिलं आहे. शिवसेनेत असताना त्यांनी नारायण राणे यांच्यासोबत पक्षाला रामराम ठोकला होता. मोहिते यांनी शिवसेना, भाजप, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास केलाय.
सुबोध मोहिते हे पहिल्यांना शिवसेनेकडून रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून लोकसभेवर गेले होते. मात्र, त्यानंतर ते रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकले नाहीत. पुढे त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली पण तिथेही त्यांना यश मिळालं नाही. त्यानंतर बराच काळापासून सुबोध मोहिते हे राजकारणापासून अलिप्त होते. त्यानंतर आज अखेर सुबोध मोहिते यांनी पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. पवारांनी त्यांच्या हाती राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा देत त्यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलही उपस्थित होते.
सुबोध मोहिते यांचे विदर्भातील विशेषत: वऱ्हाड भागातील समाजाशी त्यांचे घनिष्ट संबंध आहे. लोकसभेत आम्ही त्यांचं काम पाहिलं आहे. लोकसभेत, राज्यसभेत विविध पक्षाचे लोक येत असतात. पण प्रामुख्याने तरुण मंडळींनी एखाद्या विषयाची चांगल्या प्रकारे मांडणी केल्यानंतर अनुभवी लोकांकडून त्यांची दखल घेतली जाते. सुबोध मोहिते संसंदेत आल्यावर उत्तम काम करणारा तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहत होतो. अलीकडे ते राजकीय वर्तुळापासून बाहेर होते असं दिसत होतं. पण आज त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करुन विदर्भात राष्ट्रवादीचं काम वाढवण्याचा शब्द दिला आहे. त्यांच्या अनुभवाचा, कर्तृत्वाचा वापर सामान्य जनतेच्या भल्यासाठी कसा करुन घेता येईल, हे राष्ट्रवादी काँग्रेस पाहिलं, असं पवार मोहितेंच्या पक्षप्रवेशावेळी म्हणाले.
छापेमारीची आम्ही चिंता करत नाही – पवार
हे काही नवीन नाही. अनिल देशमुखांच्या आधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर झाला आहे. त्याची आम्हाला चिंता वाटत नाही. तसंच त्याला महत्व देण्याचीही गरज नाही. यापूर्वीही देशमुख यांच्या घरावर छापेमारी करत त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यात आला. पण त्यात काही हाती लागलं नाही. आताही काही लागणार नाही. त्यामुळे त्याबाबत आम्हाला कसलीच चिंता वाटत नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी अनिल देशमुखांवर सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.




