
नवी दिल्ली : देशातील ३-४ उद्योगपतींची ताकद भारतातील शेतकऱ्यांसमोर उभी राहू शकत नाही हे आम्हाला माहिती होतं. पंतप्रधानांनी माफी मागितली त्याचा अर्थ त्यांनी हे स्वीकार केले आहे की त्यांच्या चुकीमुळे ७०० लोकं मारली गेली. पंतप्रधानांच्या चुकीमुळे हे आंदोलन झालं. जर त्यांनी चूक स्वीकारली असेल तर नुकसान भरपाई करावीच लागेल, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला.
केंद्र सरकारने आणलेल्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन उभं केले. २ महिन्यापासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे सरकार झुकलं. त्यानंतर हे कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. संसदेत कृषी कायदे परत घेतल्यानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आनंद व्यक्त केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, शेतकरी आंदोलन केंद्र सरकारच्या चुकीमुळे झालं आहे. ज्यापद्धतीने संसदेत कुठलीही चर्चा न करता कायदे रद्द केले. हे पाहून सरकार चर्चेला घाबरलंय हे दिसतं. सरकारने चुकीचे केले हे त्यांना माहिती आहे. ७०० शेतकऱ्यांचा आंदोलनामुळे मृत्यू झाला. कायदा लागू करण्यामागे कुठली शक्ती होती? यावर चर्चा झाली पाहिजे होती परंतु सरकारने ते होऊ दिलं नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
दरम्यान, केंद्र सरकारने लागू केलेले ३ काळे कायदे परत घ्यावे लागतील हे आम्ही यापूर्वीच सांगितले होते. ३-४ उद्योगपतींची शक्ती भारतातील शेतकऱ्यांसमोर उभी राहू शकत नाही. आणि तेच झालं काळे कायदे सरकारला रद्द करावे लागले. हा शेतकऱ्यांचा विजय आहे, देशाचा विजय आहे अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना दिली.




