तृणमूलचा रिकाम्या खुर्च्यांवरुन भाजपला सणसणीत टोला

नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये आगामी निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्षांकडून सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. याच दरम्यान घोषवाक्य आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर हल्लाबोल केला जात आहे. भाजपाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करुन ममतांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. प्रसिद्ध वेब सीरिज मनी हाइस्टचं थीम साँग ‘बेला चाओ’च्या धर्तीवर बंगाली भाषेत ‘पिशी जाओ’ (आंटी जाओ) या गाण्याद्वारे ममता बॅनर्जींना लक्ष्य करण्यात आलं होतं.
भाजपाने केलेल्या टीकेला आता तृणमुल काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तृणमुलने सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत असलेल्या “Pawri ho rahi hai” ट्रेंडच्या आधारे भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच बंगालमधील भाजपाच्या जनसभेचा एक फोटो तृणमुलने आपल्या अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या सभेला केवळ एक व्यक्ती उपस्थित आहे तर इतर सर्व खुर्च्या रिकाम्या असलेल्या दिसत आहेत. स्टेजवरती भाषण देणाऱ्या नेत्यांचीच गर्दी आहे. फक्त एक माणूस खुर्चीवर बसला आणि अन्य सर्व खुर्च्या खाली आहेत. हा फोटो ट्विट करत तृणमुलने “ये भाजपा बंगाल है….ये उनकी जनसभा है…और यहा उनकी pawri (पार्टी) ho rahi hai!” असं म्हटलं आहे.
टीएमसीने हा फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सोशल मीडियावर मीम्सने धुमाकूळ घातला आहे. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पार्टी आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. याच दरम्यान भाजपाने परिवर्तन यात्रेचे आयोजन केलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते. परिवर्तन यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये अमित शहांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला. “ममता बॅनर्जींचं सरकार असेपर्यंत येथील कायदा सुव्यवस्थेची स्थिती सुधारेल का?” असा सवाल त्यांनी केला.
अमित शहा यांनी “आगामी विधानसभा निवडणूक ही आमचे बूथ कार्यकर्ते आणि तृणमूल काँग्रेसमधील लागेबांधे असणाऱ्यांमध्ये होणार आहे. ममता बॅनर्जींना सत्तेपासून दूर करणं हे आमचं ध्येय नाही. पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती बदलणं हे आमचं मुख्य ध्येय आहे. राज्यातील गरीब जनतेची परिस्थिती सुधारणं, राज्यातील महिलांची परिस्थिती सुधारणं हेच आमचं प्राधान्य असणार आहे” असं म्हटलं होतं. भाजपाने सुरू केलेल्या निवडणूक प्रचारामधील ही पाचवी परिवर्तन रॅली आहे. रॅलीमधून तसेच सभांमधून एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे.