
तळेगाव : आर्यन खान अटक प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवीनच दावा केला आहे. नवाब मलिक सारख्यांना मी खिशात ठेवतो, असं वक्तव्य पाटील यांनी केली.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील तळेगांवमध्ये केसर या हॉटेलचं उद्घाटन झालं. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडले. वानखेडे हा माझा जावई नाही आणि भाजपचा देखील नाही. वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात जे सुरू आहे ते सुरू राहावं. परंतु, सर्वसामान्य माणूस हा वानखेडे यांच्या मागे उभा आहे. त्याची मलिकांनी जास्त टेस्ट घेऊ नये. कारण समाज हा नेहमी ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या पाठीशी असतो आणि अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्यावर अन्याय होतो तेंव्हा समाज हा पाठीशी राहतोच हे नवाब मलिकांनी ध्यानात ठेवावं, अस वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, नवाब मलिक रोज भाजपवर टीका करतात असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी ‘असे लोक मी खिशात ठेवतो’ अशी देखील टिप्पणी केली.
दरम्यान, ‘पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त’ या ट्विटबद्दल बोलताना नवाब मलिक म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबी बोगस केस तयार करून कारवाई करत आहेत. समीर वानखेडे यांनी जबाबदारी स्वीकारल्या नंतर बोगस केस तयार करून पब्लिसिटी करीत होते. पण नंतर हळूहळू हा फर्जीवाडा आम्ही समोर आणला. किरण गोसावीच्या सेल्फीनंतर एकएक बाजू उघडत गेली आणि जे आज बाहेर होते ते जेलमध्ये आहेत. यापुढेही एनसीबीची पोलखोल करत राहणार, असंही नवाब मलिक म्हणाले.




