
मुंबई : मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने विद्यार्थी एमएचटी सीईटी परीक्षेसाठी पोहोचू शकले नाहीत. या प्रकरणाची दखल आता राज्य सरकारने घेतली आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पोहोचता आलेले नाही असे विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊ शकणार आहेत.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे की,राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये.
माननीय @CMOMaharashtra उद्धव साहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार राज्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. pic.twitter.com/lYP9QHqw7T
— Uday Samant (@samant_uday) September 29, 2021
राज्यात काही जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
सतत दोन दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येथील.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या जोरदार पावसाने जटवाडा रोडवरील बंधारा फुटला त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले. आज जटवडा येथील एव्हरेस्ट कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये एमएचटीसीईटी २०२१ ची परीक्षा देण्यासाठी या सेंटरवरील सर्व विद्यार्थी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या परीक्षेचा काय हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
केवळ औरंगाबादच नाही तर नांदेड आणि इतर मराठवाड्याच्या भागातूनही विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी पोचले होते. त्यातील नांदेड येथून आलेल्या एका विद्यार्थ्यांनी आपण कसे अडकलो आणि सेंटरपर्यंत पोहोचू शकलो नाहीत याची कैफियत सांगितली. अनेक ठिकाणी विद्यार्थी परीक्षेसाठी पोहोचू शकले नाहीत. विशेष करून ग्रामीण भागातील जवळपास सर्वच नद्यांना पूर आल्याने विद्यार्थी अडकून पडले.
पावसामुळे नांदेडमध्ये काही विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटीची परीक्षा देता आली नाही. लातूर रोड येथील होरीजन स्कूल येथे एमएचटी-सीईटीचे परीक्षा सेंटर होते. दोन सत्रात जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा घेण्यात येणार होती. बी फार्मसी आणि डी फार्मसीसाठी ही पूर्व परिक्षा होती. मात्र काल पावसामुळे सकाळी ९ ते १२ या वेळेची परीक्षा होऊ शकली नाही. परीक्षा केंद्रावर जाण्याऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना सेंटरमध्ये पोहोचता आलेले नाही. परीक्षा देण्यासाठी अनेक ठिकाणांहून दूरवरून विद्यार्थी आले होते. सकाळी साडे सात वाजल्यापासून परीक्षा सेंटरच्या अलीकडेच येऊन विद्यार्थी अडकले होते. रस्त्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाहनांची व्यवस्था झाली नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचता आलेच नाही.




