मुंबईच्या लोकलमध्ये ‘विषारी गॅस’ हल्ल्याचा दहशतवाद्यांचा कट ?

मुंबई : दिल्ली पोलीस आणि यूपी एटीएसनं १४ सप्टेंबर रोजी ६ दहशतवाद्यांना अटक करून देशावरील मोठं संकट टाळलं आहे. या दहशतवाद्यांच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ल्याचं प्लॅनिंच रचत होते. मुंबईसह देशातील प्रमुख आणि मोठ्या शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणांना अलर्टवर आल्या आहेत. याच दरम्यान शनिवारी सकाळी महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई क्राईम ब्रांचनं संयुक्त कारवाई करत जोगेश्वरी येथून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
या संशयिताचं नाव जाकीर आहे. दहशतवाद्यांच्या चौकशीदरम्यान आणखी एक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी जे दहशतवादी पकडले आहेत त्यांनी मुंबई लोकलमध्ये विषारी गॅस सोडण्याचा प्लॅन रचला होता. या माहितीनं खळबळ माजली आहे. गुप्तचर विभागाने याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती दिली आहे. मुंबई लोकल आणि स्टेशनवर सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे. काहीही संशयास्पद हालचाल दिसली तरी तात्काळ तपासणी करावी असे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे स्टेशनवरील मुख्य प्रवेशद्वार सोडून सर्व गेट बंद करण्यात आले आहेत. हल्ल्याचं षडयंत्र उघड झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलद्वारे १४ सप्टेंबरला देशभरात दहशतवादी हल्ल्याचं षडयंत्र रचणाऱ्या ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. रामनवमी, नवरात्री या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर देशभरात गर्दीच्या ठिकाणी हल्ला करण्याचं प्लॅनिंग होते. त्यासाठी मुख्यत: मुंबई, उत्तर प्रदेशच्या अनेक प्रसिद्ध भागाची रेकी करण्यात आली होती. मुंबईत लोकल, गिरगाव चौपाटी, मरिन ड्राईव्ह याठिकाणी रेकी केल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी आणखी एका संशयिताला जोगेश्वरी येथील घरातून ताब्यात घेतले. या संशयिताचं नाव जाकीर आहे. दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या ६ दहशतवाद्यांपैकी एक जान मोहम्मद शेखचं मुंबई कनेक्शन समोर आलं होतं. जान मोहम्मद मुंबईतील धारावी भागात राहणारा होता. त्याला मुंबई ते दिल्ली जाताना राजस्थानच्या कोटा येथून अटक करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनीही शहरात शोध मोहिम आखली. मुंबईत गणेशोत्सवावेळी टार्गेट पूर्ण करायचं असं षडयंत्र दहशतवाद्यांनी रचलं होतं. त्यात मुंबई लोकलमध्ये विषारी गॅस सोडून दहशत पसरवण्याची योजना दहशतवाद्यांनी आखली असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली.




