विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबतचा सस्पेन्स बीसीसीआयकडून दूर !

मुंबई : टी -२० विश्वचषकापूर्वी विराट कोहलीचे कर्णधारपद पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. आयसीसी वर्ल्ड टी-२० नंतर विराट कोहली टी -२० आणि एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे क्रिकेट जगतात चर्चांना एकच उधाण आलं आहे. आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही याबाबतचा संभ्रम दूर केला आहे. जय शाह यांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीवर भर देताना सांगितले की, सध्या संघ जी कामगिरी करत आहे, ती चांगली होत आहे. त्यामुळे कर्णधारपद बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
टीम इंडियाचा वन डे आणि टी-२० संघाची धुरा विराट कोहलीकडून रोहित शर्माकडे सोपवले जाण्याचे वृत्त नुकतंच प्रसिद्ध झालं होतं. मात्र त्यानंतर बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धूमल यांनी या सर्व बातम्या निराधार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआयचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह यांनीही याबाबतचा संभ्रम दूर केला आहे.
जय शाह यांनी विराट कोहलीच्या नेतृत्त्वाला संघाच्या कामगिरीशी जोडलं. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने २-१ ने आघाडी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर टी-२० मध्ये विराटच्या नेतृत्त्वात टीम इंडियाच्या जबरदस्त कामगिरी केल्याचंही शाह म्हणाले. कोहलीच्या नेतृत्त्वात टीम इंडिया टी-२० किंवा वन डेमध्ये सहसा पराभूत झालेली नाही.
भारताने इंग्लंडविरुद्ध ३–२ असा विजय मिळवला, ऑस्ट्रेलियामध्ये २-१ ने जिंकले, श्रीलंकेला २-० ने पराभूत केले आणि न्यूझीलंडला ४-० ने हरवले. मात्र, विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारताला आयसीसी स्पर्धेची ट्रॉफी जिंकता आली नाही. त्याच्यासमोर आयसीसी स्पर्धा जिंकणे हे अजूनही मोठे आव्हान आहे.




