पोपटपंची आणि दलाली खाणे यांचा हाच धंदा; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

औरंगाबाद : ठाकरे सरकार हे मुंबईच्या मोठ्या इमारतीत हरवलं सरकार आहे. त्यांना सर्वसामान्यांशी काही घेणंदेणं नाही. यांचा दलाली खाण्याचाच धंदा आहे. रोज सकाळी उठायचं कोणत्याही विषयावर बोलायचं. नको त्याविषयावर पोपचपंची करायची. मात्र एखाद्या महत्वाच्या विषयावर कधी बोलायचं नाही. हेच या सरकारचे धोरण असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेत, महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही पायाला भिंगरी बांधून दौऱ्यांचा सपाटा लवात आहेत. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस औरंगाबाद आणि नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. औरंगाबादेतून त्यांनी सकाळपासून टार्गेट ठाकरे सरकार हाच अजेंडा चालू ठेवला आहे. त्यामुळे फडणवीस सारखे टीकेचे तिखट बाण चालवत आहेत. तर शिवसेना नेतेही फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. आता ठाकरे सरकारचा दलाली खाणे हाच धंदा असल्याचे सांगत पुन्हा ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
सुडाचं राजकारण कोण करतंय हे दिसतंय. असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कालच्या टीकेलाही उत्तर दिलंय. नारायण राणेंना केलेली अटक. किरीट सोमय्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. रवी राणा यांच्याबाबत काही झालं तेही लोक पाहत आहेत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना उत्तर दिलंय.
फडणवीस नैराश्यातून बोलत आहेत
फडणवीसांना प्रत्युत्तर देताना, फडणवीसांना नैराश्य आलंय. फडणवीसांवर बोलण्यासरखं काही राहिलं नाही, असा घणाघात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे सध्या आदित्य ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना रंगतानाही दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांनी सर्वसामान्य जनतेला वीट आलाय. मात्र या नेत्यांचे बाण काही भात्यात राहिनात. रोज नवे आरोप सुरू आहेत. येणाऱ्या अधिवेशातही हेच चित्र दिसून येण्याची जास्त शक्यता आहे. सकाळीच किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदत घेत पुन्हा संजय राऊतांना टार्गेट केलं आहे, तर संजय राऊत किरीट सोमय्यांचा वेळोवेळी खरपूस शब्दात समाचार घेत आहेत.




