
पुणे : राज्य सरकारने २६ जिल्ह्यांमध्ये निर्बंध हटवले असून रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने खुली करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, वगळण्यात आलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने पुण्याचा समावेश आहे. त्यामुळे, पुणेकर व्यापारी सरकारवर नाराज आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत प्रशासन व राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत.
अमृता फडणवीस यांनी गुरूवारी पुण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. येथील धागा हॅन्डलूम महोत्सवाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं असून, महोत्सवाचं उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना राजकीय विषयांवरही त्यांनी भाष्य केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करून खरेदी करावी. राज्यात अनेक ठिकाणी नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे तिथे व्यवहार सुरू झाले आहेत. पुण्यात फक्त ४ टक्के रुग्णसंख्या असतानाही पुणे खुलं का झालं नाही? मुंबईतील निर्बंध हटवण्यात आले आहेत, तर पुण्यातील का नाही? त्यासाठी तुम्ही धरणे धरायला पाहिजे”, असं आवाहन अमृता फडणवीस यांनी पुणेकरांना केलं. तसेच, महाविकास आघाडी सरकारला टोलाही लगावला. त्या आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्या नेहमीच महाविकास आघाडी सरकारवर टीका करतात. पूरग्रस्तांसाठी दिलेल्या पॅकेजसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुनही त्यांनी, या पॅकेजमध्ये महावसुली नाही झाली तर बरं, असे म्हणत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. अमृता यांच्या या उत्तरानंतर महाविकास आघाडी सरकारमधील कोणती गोष्ट किंवा काम तुम्हाला आवडलं? असा प्रश्न पत्रकाराने विचारला होता. त्यावरही, त्यांनी चांगलाच टोला लगावला. महाविकास आघाडी सरकारमधील हे तिन्ही पक्ष एकत्रपणे एकमेकांची पाठ ज्या पद्धतीने खाजवतात ते मला खूप आवडतं, असे अमृता यांनी म्हटले आहे.
एमव्हीए हे सरकार खूप कमकुवत आहे, ते कधी पडते याचा ध्यास सगळ्यांना लागलाय. हे सरकार पडल्यास भाजपा चांगला पर्याय देईल, असे अमृता यांनी म्हटलं. त्यानंतर, तुमच्यासोबत शिवसेना नाही, राष्ट्रवादी किंवा काँग्रेसही नाही, मग तुम्ही पर्याय कसा देणार? असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला. त्यावर, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी वार्तालाप करेन, त्यानंतरच तुम्हाला सांगेन, असं उत्तर अमृता यांनी दिलं. त्यामुळे उपस्थित पत्रकार परिषदेत चांगलाच हंशा पिकला.
गणेश चतुर्थीच्या अगोदर नवं गाणं
अमृता फडणवीस या प्रोफेशनली गायिका असून यापूर्वीही त्यांची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. आपल्या गाण्यांमधून सामाजिक विषयांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. आता, तुमचं पुढचं गाणं कधी? असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला होता. त्यावरही त्यांनी माहिती दिली. गणेश चतुर्थीच्या अगोदर माझं नवीन गाणं येतंय.
शरद पवार आणि अमित शहा यांच्या दिल्लीतील भेटीबाबतही अमृता यांनी मत व्यक्त केलं. दिल्लीत जे नेते भेटले आहेत, ते यापूर्वीपासूनच भेटत आहेत, ते आजच भेटले असं नाही, असं अमृता यांनी म्हटलं.




