राजकारण

राजीव सातव अनंतात विलीन; कळमनुरीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

हिंगोली : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं रविवारी निधन झालं. वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील रुग्णालयात उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांच्या निधनातं वृत्त कळतात राज्य आणि देशाच्या राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात आली. सोमवारी त्यांच्यावर हिंगोलीतील कळमनुरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबतच इतरही मोठ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची हजेरी कळमनुरी येथे पाहायला मिळाली.

राजीव सातव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी त्यांचा मुलगा पुष्कराज याने मुखाग्नी दिला. यावेळी अंत्यसंस्कारांपूर्वी कळमनुरी येथे उपस्थित नेतेमंडळींनी सातव यांना आदरांजली वाहिली. अंत्यसंस्कारांसाठीच्या चौथऱ्यावर त्यांचं पार्थिव ठेवण्यासाठी नेण्यात आलं तेव्हा कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. राजकारणातील अभ्यासू आणि सुसंस्कृत व्यक्ती, अशी त्यांची ओळख होती.

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर हिंगोली सारख्या एका छोट्याश्या जिल्ह्यातून पंचायत समिती सदस्य ते थेट खासदार अशी अत्यंत कमी वयात राजीव सातव यांनी मजल मारली. उच्चशिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक बाणा असलेले राजीव सातव यांनी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठं योगदान दिलं. उच्च विचारसरणी आणि साधी राहणीमान या धोरणाने काँग्रेस पक्षात त्यांनी आपलं मोठं वजन निर्माण केले होतं. पक्षातही युवक काँग्रेसचे सरचिटणीस, प्रदेश अध्यक्ष ते युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष अशी पद त्यांनी भूषवली. शिवाय सध्या ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निमंत्रित सदस्यही होते.

राजीव सातव यांच्या अकाली मृत्यूमुळे काँग्रेस पक्षाचे न भरून येणारे नुकसान झालं आहे. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button