पवारसाहेबांनी पटोलेंचा पार पान टपरीवालाच करून टाकला; निलेश राणेंची टीका

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना अनुल्लेखाने मारल्याने उलटसुलट चर्चा होत आहे. त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनीही पटोलेंवर टीका केली आहे. पवार साहेबांनी पटोलेंचा पार पान टपरीवालाच करून टाकला आहे, अशी खोचक टीका निलेश राणे यांनी केली आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. अरे रे रे… पवार साहेब कधी कधी वाटतं तुम्ही काही लोकांची लायकी खूप चांगली ओळखता. नाना पटोले आता कुठे स्वतःला मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत बघू लागले होते. तेवढ्यात पवार साहेबांनी त्यांना पान टपरीवालाचं करून टाकला, असं खोचक ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
शरद पवार यांनी बारामतीत त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीत पाठित सुरा खुपसला जात आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. त्याबद्दल तुमचं काय मत आहे, असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी पटोले यांना थेट त्यांची जागाच दाखवली. या गोष्टीत मी काही पडत नाहीत. पटोलेंसारखी माणसं लहान आहेत. लहान माणसांवर मी बोलणार नाही. सोनिया गांधी बोलल्या असत्यात तर भाष्य केलं असतं, असं पवार म्हणाले. पवारांच्या या खोचक टीकेमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
पटोले लोणावळ्यात होते. एका मेळाव्याला संबोधित करत होते. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो. मी बोलल्यावर खुपतं, असं सांगतानाच आपण काहीच बोलायचं नाही. पण तो त्रास आपली ताकद बनवा. मी स्वबळावर लढायचं म्हणालो. यावर माघार घेणार नाही. त्यामुळे कामाला लागा, असं पटोले म्हणाले होते.