![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/06/nana-patole-l.jpg)
मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अन्य आरोपींना एनसीबीने अटक केलीय. कोर्टानं आर्यन खानची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलीय. या प्रकरणावरुन एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आर्यन खानच्या अटकेवरुन भाजपवर गंभीर आरोप केलाय. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा कट शिजत असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.
एनसीबी ज्या प्रकारे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावरुन निश्चितपणे दाल मे कुछ काला है. एका मोठ्या नायकाच्या, शाहरुखच्या मुलाच्या विरोधात हे षडयंत्र करुन हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पटोले यांच्या या आरोपांवर भाजप नेते काय उत्तर देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
एनसीबीच्या कारवायांबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, ते चुकीचे करतील त्यावर कारवाई झाली पाहिजे. पण अदानी मुंद्रा बंदरावर 3 हजार किलो अंमली पदार्थ सापडले त्याचे काय झाले. त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. आपल्या उद्योगपती मित्रांना वाचवण्यासाठी व अदानी मुंद्रा बंदरावर सापडलेल्या अंमलपदार्थाच्या मोठ्या साठ्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मुंबईत कारवाया केल्याचे दाखवले जात आहे. मुंबईतील एनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है…’ असे वाटते. शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीने अटक केली त्याला हिंदू-मुस्लीम रंग देण्याचा अत्यंत हिन प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचा आरोप पटोले यांनी केलाय.