Top Newsराजकारण

मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढले !

अमृता फडणवीसांचा ‘जावई शोध’!

मुंबई : मुंबईतील वाहतूककोंडीमुळे घटस्फोट होत असल्याचे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना अमृता फडणवीस यांनी मुंबईतील खड्ड्यांचा घटस्फोटांशी संबंध जोडला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी मुंबईतील पायाभूत सुविधांवरून सत्ताधारी शिवसेनेला जाणीवपूर्वक चिमटा काढल्याचे म्हटले जात आहे.

यात मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे ३ टक्के जोडप्यांचे घटस्फोट होत असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले. मुंबईत वाहतूक कोंडी वाढली असून खड्ड्यांमुळे आणखीच कोंडी होत आहे. एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला वाहतूक कोंडीचा हा त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे अनेकांना आपल्या कुटुंबाला वेळ देता येत नाही. त्यातून तणाव निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.

मुंबईत किती कामे रेंगाळलीत. मेट्रोचे काम, रस्त्याची कामे, एसटी कर्मचार्‍यांचे प्रश्न, काहीही पुढेच सरकत नाहीय. महावसुली सरकारची कामेच मुळात पक्षपातीपणाची आहेत. मी नाही, तर पूर्ण जग हे बोलत आहे. याबाबतीत दुमत नाही, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली.

बंडातात्यांनी केलेल्या विधानावर पत्रकारांनी त्यांना छेडले असता अमृता फडणवीस म्हणाल्या, स्त्रियांवर अत्याचार होतात, तेव्हा आपण कारवाई करतो. कधी कोणी काहीही बोलतो. त्यानंतर त्याच्यावर कारवाई केली जाते. माझ्या मते कुणावरही वैयक्तिक टीका व्हायला नको.

‘जावई शोध’ कुठून लावला? : महापौरांचा सवाल

हा ‘जावई शोध’ अमृता फडणवीस यांनी कुठून लावला? मागील काही महिन्यांपासून ‘ऐकावं ते नवल’, अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यात येत आहेत. भाजपच्या संबंधित लोकांमुळे होत असलेल्या वक्तव्यामुळे लोकांची करमणूक होते. मात्र, आता लोकही त्यांच्या अशा वक्तव्याला कंटाळले आहेत. मुंबईला हेतूपूर्वक बदनाम करण्याचे काम भाजपकडून सध्या सुरू आहे, असा आरोप महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

अमृता फडणवीस यांना मानसिक तज्ज्ञांची गरज : चाकणकर

पदावर नसताना राजकीय वक्तव्ये कशासाठी? असा सवाल करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांना मानसिक तज्ज्ञांची गरज असल्याचा टोला लगावला. वाईन ही दारूच आहे, सुपर मार्केटमध्ये ठेवणे अयोग्य आहे. लहान मूल, महिला नेहमी त्या ठिकाणी जातात. वाईन दुकानात ठेवण्यास परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत आहे, असा आरोप अमृता फडणवीस यांनी केला होता. त्यावर अशा पद्धतीचं ट्विट करणे म्हणजे आत्मचिंतनाची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button