मुंबई काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर; भाई जगतापांविरोधात राहुल, सोनियांकडे तक्रार

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. कारण मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार केली आहे. भाई जगतापांची कार्यपद्धतीवर बोट ठेवत, आपल्याला डावललं जात असल्याचा आरोप झिशान सिद्दीकींनी केली आहे.
काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी पत्र लिहून भाई जगताप यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली. माझ्याच पक्षाचा अध्यक्ष माझ्याविरोधात कारवाया करत आहे, असा आरोप आमदार झिशान सिद्दीकी यांनी केला. झिशान सिद्दीकी यांच्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाने कार्यक्रम घेतला, स्थानिक आमदार असून बोलवलं नाही. मुंबई युवा काँग्रेस निवडणुकीत झिशान सिद्दीकी यांच्या उमेदवाराला मदत केल्यास पक्षात पद देणार नाही असं नगरसेवक आणि पदाधिकारी यांना भाई जगताप यांनी सांगितल्याचा उल्लेख पत्रात केला आहे.
काही दिवसांपूर्वी बीकेसी पोलीस स्थानकात मुंबई काँग्रेसने पोलिसांना कोरोनासाठी आवश्यक साधन सामुग्री वाटप केले, त्या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. पण स्थानिक आमदार असून झिशान सिद्दीकी यांना बोलवण्यात आले नाही,प्रोटोकॉल पाळले जात नाही अशी तक्रार झिशान सिद्दीकी यांनी केली.
पक्षात माझ्याविरुद्ध काम करणाऱ्यांना ताकद दिली जाते अशी तक्रार ही झिशान सिद्दीकींनी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना लिहिलेलं पत्र झिशान यांनी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, सी. वेणूगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप यांना देखील पाठवले आहे.
चर्चा करुन मार्ग काढेन : भाई जगताप
नेमकं प्रकरण काय हे त्यालाच विचारा. प्रत्येकाला काँग्रेसमध्ये विचार मांडण्याचा अधिकार आहे. आमच्या पक्षात लोकशाही आहे. सोनिया गांधी असो किंवा राहुल गांधी असो त्यांच्याकडे मांडण्याचा अधिकार आहे. मुंबईत आमचे चार आमदार आहेत, त्यापैकी तो सर्वात तरुण आमदार आहे. त्याचा उत्साह मी समजू शकतो. त्याचं जेवढं वय आहे, त्यापेक्षा जास्त कालावधीत मी राजकारणात आहेत आणि फक्त आणि फक्त काँग्रेसमध्ये. त्यामुळे माझी कारकीर्द, कामकाजाची पद्धत नेत्यांना माहिती आहे. जाणीवपूर्वक मी अध्यक्ष म्हणून वेगळी वागणूक कोणाला देत नाही. ज्यावेळी अपेक्षा व्यक्त केल्या जातात, प्रोटोकॉल असेल तर तो झिशान सिद्दीकीलाही लागतो आणि भाई जगतापलाही लागतो. मी झिशान सिद्दीकीशी चर्चा करुन, नाराजीबद्दल मार्ग काढेन, असं भाई जगताप म्हणाले.




