
पुणे : कोरोनानं गेल्या दीड वर्षांपासून सर्वत्र हाहाकार माजवला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे, उद्योगधंदे बुडाले आहेत तर अनेक जणांना आर्थिक फटका बसला आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका हा होतकरू विद्यार्थ्यांना बसला आहे. पुण्यात अशाच एका विद्यार्थ्यानं एमपीएससीची परीक्षा दोन वर्षांपूर्वी पास केली मात्र अजूनही नोकरी न लागल्यामुळे त्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
स्वप्नील सुनील लोणकर (वय २४) असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. फुरसुंगी इथे राहत्या घरी त्यानं आत्महत्या केली आहे. स्वप्नीलचे वडील हे प्रिंटिंगचा व्यवसाय करतात. स्वप्नील हा सिव्हिल इंजिनिअर होता आणि त्यानं मोठ्या जिद्दीनं एमपीएससीची परीक्षा दिली होती आणि उत्तीर्णही झाला होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याला नोकरी मिळाली नव्हतो. यामुळे तो नैराश्यात गेला होता.
स्वप्नीलनं २०१९ साली एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र त्याची मुलाखत होऊ शकली नव्हती. त्यानंतर २०२० मध्ये त्यानं पूर्व परीक्षा पास केली होती, मात्र कोरोनामुळे मुख्य परीक्षा होऊ शकली नाही. या सर्व गोष्टींमुळे यश पदरी पडत असूनही त्याच्या पदरी निराशाच होती. म्हणून त्यानं आत्महत्या केली अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय. ‘परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर कदाचित आयुष्यच वेगळं असतं’ असं स्वप्नीलनं चिठ्ठीत लिहून ठेवलंय. त्यामुळे त्यानं परीक्षांच्या अनियमिततेमुळे आपलं आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे.



