राजकारण

मिश्रा हेच ‘लखीमपूर’चे सूत्रधार; त्यांची हकालपट्टी करा; भाजप नेत्याचीच मागणी

नवी दिल्ली : लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, तसेच चौकशीला तो सहकार्य़ करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आशिष मिश्राची १२ तास चौकशी करण्यात आली. यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. याच दरम्यान आता या प्रकरणावरून भाजपाच्या एका नेत्याने जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी मिश्रांना मंत्रिपदावरून हटवावं अशी मागणी केली आहे.

भाजपचे नेते आणि माजी आमदार राम इकबाल सिंह यांनी अजय मिश्रा हेच लखीमपूर हिंसाचाराचा कट रचणारे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिश्रा यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील केली आहे. राम इकबाल सिंह यांनी लखीमपूर हिंसाचारात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा दोषी आहेत. या हिंसाचाराआधी मिश्रा यांनी दिलेल्या भडकाऊ विधानानेच आगीत तेल ओतण्याचं काम केलं. त्यांनी खरंतर शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. मात्र ते स्वतःच्या मुलाला वाचवण्याचं काम करत आहेत. त्यांना या हिंसाचारावर जरासाही पश्चाताप नाही, असं म्हटलं आहे.

गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर त्याला अटक झाली. मात्र अजय मिश्रा आजही केंद्रीय गृह राज्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर कायम आहेत. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना तात्काळ पदावरून हटवलं पाहिजे. गेल्या काही दिवसात झालेली लखीमपूर हिंसाचाराची घटना आणि गोरखपूरमधील व्यापाऱ्याच्या हत्येनं पक्षाची बदनामी झाली आहे, असं देखील राम इकबाल सिंह यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button