मुख्यमंत्र्यांनी राज्याला काळीमा फासला : खा. नारायण राणे
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बप्रकरणात गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अथवा देऊ नये हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. पण या प्रकरणात झालेल्या आरोपाने महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याला काळिमा फासला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली.
नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा ठकारे सरकारवर हल्लाबोल केला. सचिन वाझेंना पोलीस खात्यात आम्ही आणलं नाही, असं अनिल देशमुख आणि परमबीर सिंगही म्हणत आहेत. म्हणजेच वाझेंना पोलीस खात्यात मुख्यमंत्र्यांनी आणल्याचं स्पष्ट होत आहे. सिंग यांचा रोख थेट मुख्यमंत्र्यांच्या दिशेने आहे. वाझे हे मुख्यमंत्र्यांसाठीच काम करत होते. तेच त्यांचे वाझेंचे गॉडफादर आहेत. हिरेन यांना मारण्याचं पाप वाझेंनीच केलं आहे. वाझे सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देत होते. त्यामुळे वाझे हे मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शक होते का? असा सवाल करतानाच या प्रकरणात गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या अथवा नका घेऊ, फम पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी राणे यांनी केली.
राज्यात पैसे द्या आणि मुडदे पाडा असा कारभार सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असं सांगतनाच वाझेंची चौकशी होत आहे. आता गृहमंत्र्यांचीही होईल. राज्याला मुख्यमंत्र्यांनी काळीमा फासला आहे. असा बेजबाबदार मुख्यमंत्री पूर्वी झाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकक्षणही खुर्चीवर राहू नये, असं ते म्हणाले. परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांबाबत मुख्यमंत्र्यांना आधी कळवलं होतं. मग मुख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही? असा सवालही त्यांनी केला.
सचिन वाझे कुठे राहत होते हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे. वाझे वर्षा निवासस्थानी आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये राहत होते. वर्षावर राहून वाझे सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देत होते, असा गौप्यस्फोटही राणे यांनी केला. वाझे काय करत होते. त्यांचे काय उद्योग होते, हे सर्व मुख्यमंत्र्यांना माहीत होतं, असंही त्यांनी सांगितलं.