Uncategorizedराजकारण

परमबीर सिंग यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप

महिला पोलिसाच्या खुनाच्या गुन्ह्यात अधिकाऱ्याला अडकवले !

नाशिक : वाहतूक विभागातील गैरव्यवहारप्रकरणाचा पर्दाफाश केल्यामुळे दुखावलेले तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनीच मला सुभद्रा पवार या पोलिस कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात अडकविल्याचा धक्कादायक आरोप नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या मुख्यालयातील पोलीस उपअधीक्षक शामकुमार निपुंगे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. आर्थिक गैरव्यवहाराचे परमवीरसिंग हेच सूत्रधार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी त्यांनी नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात १४ जून रोजी फिर्याद दिली आहे.

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन १९८८ साली पोलीस खात्यात रुजू झालेले निपुंगे हे २०१६ साली भिवंडी येथील वाहतूक शाखेत कर्तव्य बजावत असताना बेकायदेशीर वाहतुकीसंदर्भात काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांविषयी तक्रारी आल्याने त्यांनी अवजड वाहचालकांचे जबाब नोंदवून चौकशी सुरू केली होती. यावेळी तत्कालीन पोलीस आयुक्त असलेले परमबीर सिंग यांनी त्यांची तडकाफडकी बदली केली होती. ठाणे जिल्ह्यात २०१७ निपुंगे यांच्या कार्यालयातील सुभद्रा पवार या महिला पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. त्यात निपुंगे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या आरोपांबाबत बोलताना निपुंगे म्हणाले, मी नारपौली येथील गैरव्यवहाराची माहिती संकलीत करण्यास सुरूवात केली होती. त्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक थेट परमबीर सिंग यांचे नाव घेऊन एक कोटी रूपये देऊन बदली घेतल्याचे सांगत होते. सुभद्रा पवार हिची हत्या तिचा प्रियकर अमोल फफाळे याने केल्याचे परिस्थितीजन्य पुरावे समोर आले होते; मात्र सुभद्रा, अमोल फफाळे आणि सुभद्राचा भाऊ सुजीत पवार यांच्यातील संभाषण न्यायालयात सादर केले गेले नाही. तसेच शवविच्छेदनाचे रेकॉर्डींग करण्यात आले. छायाचित्र घेण्यात आले होते. प्रत्यक्ष फिर्याद आणि हे पुरावे यांची सांगड नसल्याने ते पुरावेही दाबण्यात आले. २०१७ साली मी सर्व कागदपत्रे मिळविण्यात सुरूवात केली. सुभद्रा पवार हिच्या हत्या प्रकरणात माझा थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पुराव्यांची सांगड आणि जुळवाजुळव सुरू असल्याने आता ही तक्रार करीत असल्याचे निपुंगे यांनी स्पष्ट केले. या गुन्ह्यात गोवले गेल्यामुळे माझी बदनामी होऊन पोलीस खात्यात प्रतिमा मालिन झाल्याचे त्यांनी सांगितले.

आडगाव पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीमध्ये त्यांनी परमविरसिंग यांच्यासह विविध अधिकाऱ्यांवर आपापसांत कट रचून संगनमताने अधिकारपदाचा दुरुपयोग करून खोटे पुरावे तयार करत सुभद्रा यांच्या खुनाच्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याबाबत पुराव्यानिशी फिर्याद दिली आहे.

तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह, पोलिस आयुक्त मधुकर पांडे, पोलिस उपायुक्त डॉ. डी एस स्वामी, सहायक आयुक्त रमेश धुमाळ, तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुक्तार अली बागवान, अमोल फफाळे यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीसह कट रचणे व इतर कलमांनुसार शामकुमार निपुंगे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button