राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी केंद्राकडे मुबलक करणे : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर रविवारी जोरदार हल्ला चढवल्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अमित शाहांना आता जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत एक वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकारनं राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची काहीच कारणे शिल्लक ठेवली नाहीत, असं चंद्रकांत पाटील कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातील सरकार हरवले आहे ! pic.twitter.com/VS7t3790ds
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 20, 2021
राष्ट्रपती राजवाट लागण्यासाठीची काहीच कारणे राज्य सरकारने शिल्लक ठेवली नाहीत. राज्यपालांनी याबाबत जे होतंय ते होऊ दे म्हणून बाजू काढली आहे. हे सरकार मात्र राज्यपालांचे अधिकार कमी करत सुटले आहे, असा आरोप पाटील यांनी केलाय. राज्य सरकारकडून कुलगुरुपदासाठी दोन नावे राज्यपालांना पाठवली जाणार आहेत. राज्यापालांना त्यातील एक नाव निवडावे लागणार आहे. तसंच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे प्र-कुलपती असणार आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यापीठ कायद्यातील दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी अधिवेशानात याबाबत सुधारणा विधेयक मांडले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत वक्तव्य केलं आहे.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होते. सहकारातील खूप कळणारा माणूस सहकार विभागाला मिळाला आहे. अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. त्याबाबत विचारलं असता कोण आजारी आहे, कोण जेलमध्ये आहे. राज्यात गोंधळ सुरु आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेसमोर जा. तेव्हा कळेल जनता कुणाला स्वीकारते, असं आव्हान पाटील यांनी राऊतांना दिलंय.
पेपर फुट प्रकरणावर बोलताना ‘एक दोन नाही तर तीन प्रकारचे पेपर फुटले. या सगळ्यांची पाळंमुळं राजकीय वक्तीपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी लावून धरणार आहोत’, असं पाटील म्हणाले. तर अमित शाहांनी उद्योग पळवल्याचा आरोप सुभाष देसाईंनी केलाय. त्याबाबत विचारलं असता कोणते उद्योग गुजरातमध्ये गेले याची यादी सुभाष देसाई यांनी द्यावी. काही गेले असतील तर त्यांची कारणं आणि उत्तर अमित शाहांचा विभाग देईल, असं पाटील म्हणाले.




