५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा उद्या सर्वांत माेठा टप्पा
कोलकाता : सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीतील सर्वांत माेठा आणि महत्त्वाचा टप्पा ६ एप्रिलला पार पडणार आहे. तब्बल ४७५ जागांसाठी मतदान हाेणार असून त्यासाठीचा प्रचार रविवारी थांबला. पश्चिम बंगाल आणि आसाम येथील अनुक्रमे ३१ आणि ४० जागांसाठी तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी पार पडणार आहे. तसेच तमिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी येथील सर्व जागांसाठी ६ तारखेला एकाच टप्प्यात मतदान हाेणार असून एकूण ६ हजार ४५४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी रविवारी भाजप नेते अमित शहा यांनी आसाममध्ये प्रचार सभा आणि राेड शाेंचा धडाका लावला, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचार केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही जाेरदार प्रचार केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केरळमध्ये प्रचार सभा घेतल्या. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचे पती राॅबर्ट वाड्रा यांना काेराेना झाल्यामुळे केरळ, तमिळनाडू आणि आसाममध्ये प्रचार करता आला नाही.
३१ जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान हाेत आहे. या टप्प्यात हावडा, हुगली आणि दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यांमधील मतदारसंघांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात २०५ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी केवळ १३ महिला उमेदवारांचा त्यात समावेश आहे. तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले स्वपन दासगुप्ता हे तारकेश्वर मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. भाजपमध्ये दाखल झालेली अभिनेत्री तनुश्री चक्रवर्ती ही श्यामपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.
आसाममध्ये विधानसभा निवडणुकीचा ६ एप्रिलला अखेरचा टप्पा आहे. अखेरच्या टप्प्यात ४० जागांसाठी ३५७ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे नेते हिमन्ता बिस्व सर्मा हे गुवाहाटीतील जालुकबरी मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे निवडणूक आयाेगाने त्यांना प्रचार करण्यापासून राेखले हाेते, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप उमेदवाराच्या वाहनात ‘ईव्हीएम’ आढळल्यानंतर खळबळ उडाली हाेती. या पार्श्वभूमीवर आसाममध्ये मतदान हाेणार आहे.
तमिळनाडूमध्ये २३४ जागांसाठी मतदान हाेणार असून ४ हजार ४४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जे. जयललिता आणि एम. करुणानिधी या दाेन दिग्गजांच्या निधनानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. विद्यमान मुख्यमंत्री ‘एआयएडीएमके’चे नेते ई. पलानीस्वामी हे एडाप्पडी मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत, तर त्यांचे विराेधी ‘डीएमके’चे नेते एम. के. स्टॅलिन हे काेलथूर येथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच ‘एएमएमके’चे नेते टी.टी.व्ही. दिनकरन हे काेविलपट्टी येथून निवडणूक लढवीत आहेत. राजकारणात उतरलेले अभिनेते कमल हसन उत्तर काेईम्बतूर मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत.
पुदुच्चेरीमध्ये ३० जागांसाठी ६ तारखेला मतदान हाेणार आहे. एकूण ३२४ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. सत्ताधारी काँग्रेसच्या ४ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे व्ही. नारायणसामी यांचे सरकार पडले. नारायणसामी यांनी यावेळी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी ‘एआयएनआरसी’चे नेते एन. रंगास्वामी हे यनम आणि थत्तंचावडी या दाेन मतदारसंघांतून निवडणूक लढवीत आहेत.
केरळमध्ये १४० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान हाेणार आहे. त्यासाठी ९५८ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. मेट्राेमॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांना भाजपने पलक्कड येथून उमेदवारी दिली आहे. केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे धर्मादम येथून निवडणूक लढविणार आहेत. माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते ओमेन चंडी हे पुथुपल्ली येथून विधानसभेच्या रिंगणात आहेत. इंडियन युनियन मुस्लीम लीगने २५ वर्षांमध्ये प्रथम नूरबीना राशीद यांच्या रूपाने एका महिलेला उमेदवारी दिली आहे, तर अनन्या एलेक्स या केरळमध्ये विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी ठरल्या.