मंत्री १० हजार लोकं जमवतो आणि अधिवेशनाला मात्र कोरोना!
देवेंद्र फडणवीसांकडून ठाकरे सरकारची खिल्ली

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशनापासून म्हणजेच विरोधकांच्या आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. जे अधिवेशनात मांडायचे आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण अधिवेशन घेण्याची मागणी केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. पण सरकार कायद्यात न बसणारं अधिवेशन घेत असल्याची टीका त्यांनी केलीय.
कोरोनामुळे पूर्ण अधिवेशन घेता येत नसेल तर आता लेखानुदान घ्या आणि नंतर पूर्ण अधिवेशन घ्या, अशीही मागणी भाजपने केली आहे. पण कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनासाठी तयार नाही. इथं कोरोना म्हणता आणि बाहेर तुमच्या मंत्र्यांचे सगळे कार्यक्रम सुरु आहे. तुमच्या मंत्र्यांना कुठलेच नियम नाहीत का? नियम फक्त विरोधी पक्षासाठी आहेत का? असा सवालही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना केलाय. हा प्रकार म्हणजे पूर्णपणे अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न आहे. अधिवेशन टाळण्यासाठी कोरोनाचं नाटक सुरु असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय.
संजय राठोड प्रकरण असो की वीज कापण्याचं असो, विरोधी पक्ष आक्रमक राहील, असा इशाराही फडणवीसांनी सरकारला दिला आहे. अशा प्रकरणात उघडं पडण्याच्या भीतीने सरकार अधिवेशनापासून पळ काढत असल्याची टीका त्यांनी केली आहे. जनतेच्या प्रश्नावर सरकारला काही देणंघेणं नाही. बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीवरुन वॉकआऊट करत असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेणं म्हणजे स्वत:च्या आमदारांना आणि मंत्र्यांना घाबरलं आहे. निवडणुकीत काही वेगळं चित्र निर्माण होईल का? अशी भीती सरकारला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकीचा विषयच अजेंड्यावर आणला गेला नाही, असल्याचा टोलाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. सरकार अधिवेशनाचा कालावधी पहिला आठवडा, दुसऱ्या आठवड्यात बजेट आणि दोन दिवस चर्चा असा ठरल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. त्यामुळे अधिवेशनात जेवढा कालावघधी मिळेल त्या कालावधीत सर्व आयुधांचा वापर करुन सरकारला उघडू पाडू, असा इशारा फडणवीसांनी यावेळी सरकारला दिलाय.