फडणवीसांवर ‘ऑपरेशन पश्चिम बंगाल’ची जबाबदारी

कोलकाता – भाजपा नेते आणि राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहार निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा मोठी जबाबदारी आहे, गेल्या काही महिन्यांपासून देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात येणार असं बोललं जात होतं, त्यात मागच्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीसांवर प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
त्यानंतर आता पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारातही देवेंद्र फडणवीसांवर जबाबदारी देण्यात आली आहे, त्याचसाठी सोमवारी देवेंद्र फडणवीस पश्चिम बंगालमध्ये पोहचली, याठिकाणी त्यांनी परिवर्तन यात्रेला सुरू केली. फडणवीसांनी त्यांच्या ट्विटर हॅँडलवरून काही फोटो शेअर केलेत, त्यात पश्चिम बंगालमधील सतगाचिया विधानसभा मतदारसंघात अम्तालापासून परिवर्तन रॅली सुरू केल्याची माहिती दिली, यावेळी पश्चिम बंगालच्या जनतेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रेम आणि स्नेह बघायला मिळत असल्याचं ते म्हणाले.
त्याचसोबत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार पुन्हा परत येणार नाही, याठिकाणी असलेला हिंदु नागरिक दुय्यम दर्जाचा बनला आहे, स्वत:च्या राजकारणासाठी पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधीपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आलं आहे, इतकचं नाही तर गरिबांसाठी असलेली आयुष्यमान भारत योजनेत मिळणाऱ्या ५ लाखांपर्यंत मोफत उपचार यापासून सर्वसामान्य जनता वंचित आहे असं टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर सोडलं.