ठाकरे सरकार रामाचे नाही, भिमाचे नाही आणि कामाचेही नाही : रामदास आठवले

पालघर : मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या आणि जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही यासंदर्भात चर्चा केल्याची रामदास आठवले यांनी सांगितले. विक्रमगड येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे सरकारवर रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या काव्यात्मक शैलीत जोरदार टीका केली.
रिपाइंच्यावतीने विक्रमगडच्या दिवेकर वाडी येथे आदिवासी बहुजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली. ”उद्धवजींचे सरकार नाही रामाचे, नाही भिमाचे, नाही काही कामाचे, अशी बोचरी टीका रामदास आठवले यांनी केली.
मराठा समाजाला एससी, एसटी आणि ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देऊन नये. त्यांना स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण द्यावे. सवर्ण समाजातील गरिबांना १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा केंद्र सरकारने केला. त्याला जोड देऊन देशातील मराठा, राजपूत आदी क्षत्रिय समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा संसदेत करावा. आगामी जणगणना जातीवर आधारित करावी. जातीनिहाय जनगणनेमुळे जातीयता वाढणार नाही, तर प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येनुसार न्याय वाटा मिळेल, असेही रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना सांगितले.
पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न
पालघर तालुक्यात आठ तालुके दुर्गम आहेत. त्यातील एक विक्रमगड तालुका आहे. या भागात पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न आहे. मनरेगाचे काम केलेल्या आदिवासींना राज्य सरकारने अद्याप वेतन दिलेले नाही. ही चुकीची बाब आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही कामाचे नाही. आरपीआय आणि कुणबी सेना एकत्र आली तर भविष्यात राज्यात मोठी सामाजिक आणि राजकीय क्रांती होईल. पालघर जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि आदिवासी भवन उभारण्याची मागणी होत असून, त्याच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.