राजकारण

गुजरातमध्ये आप आणि एमआयएमला लॉटरी, काँग्रेसचा पाय खोलात; भाजपने गड राखले

अहमदाबाद: गुजरातमध्ये नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती निवडणुकांचे धक्कादायक निकाल लागले आहेत. या निवडणुकीत भाजपने आपलं वर्चस्व कायम राखलं असलं तरी काँग्रेसला मात्र मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागत आहे. गुजरातमधील या निवडणुकांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमला मोठी लॉटरी लागली आहे. या दोन्ही पक्षांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावत मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे काँग्रेस समोर या दोन्ही पक्षांचं मोठं राजकीय आव्हान उभं राहिलं आहे.

गुजरातमध्ये 81 नगरपालिका, 31 जिल्हा परिषदा आणि 231 तालुका पंचायत समितींसाठी मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत 60 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं होतं. नगरपालिकांसाठी 54.95 टक्के, जिल्हा परिषदांसाठी 62.41 टक्के आणि तालुका पंचायत समित्यांसाठी 63.42 टक्के मतदान झालं होतं. या निवडणुकीत बीजेपीने 8,161, काँग्रेसने 7,778 आणि आम आदमी पार्टी (AAP)ने 2,090 उमेदवार उभे केले होते.

अरवल्लीच्या मोडासा नगरपालिकेत एमआयएमने 8 जागा जिंकल्या आहेत. या ठिकाणी एमआयएमने अवघे 12 उमेदवार उभे केले होते. या पैकी 8 जागा एमआयएमने जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे मोडासा नगरपालिकेतील काँग्रेसकडे असलेलं विरोधी पक्षनेतेपदही एमआयएमने स्वत:कडे खेचून आणलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या तंबूत खळबळ उडाली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने पाच जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर हैदराबाद नगरपालिकेच्या निवडणुकीतही मोठं यश मिळवलं होतं. आता गुजरातच्या नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही एमआयएमने मोठा विजय मिळवून सर्वच राजकीय पक्षांना धडकी भरवली आहे. एमआयएमचं देशातील प्रस्थ वाढू लागल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे पश्चिम बंगालसह पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही एमआयएम विजयाची मालिका सुरू ठेवणार का? असा सवाल केला जात आहे.

सूरत येथील ओलपाड तालुका पंचायत समितीत तर काँग्रेसचं पानीपत झालं आहे. या पंचायतीत 24 पैकी 23 जागांवर भाजपचा विजय झाला आहे. तर एका जागेवर भाजप बंडखोराचा विजय झाला आहे. त्याशिवाय खेडा जिल्ह्यातील खेडा, मातर, वासो, नडियाद, महमदाबाद, महुधा, ठासरा आणि गनतेश्वरा आदी आठही पंचायत समितीत भाजपचाच विजय झाला आहे. पोरबंदर नगरपालिकेत भाजपने 12 जागांवर विजय मिळवला आहे.

आपचं दणदणीत यश
दुसरीकडे आम आदमी पक्षानेही गुजरातमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आपने जामनगरच्या बैराज, भावनगरच्या जसैर, सूरतच्या आंबोली तालुका, अमरेलीच्या धारीमध्ये विजय मिळवला आहे. भावनगरच्या जेसल तालुका पंचायतमध्ये आपला विजय मिळाला आहे. आणनदच्या पेटलाद नगरपालिकेतही आपचा विजय झाला आहे. या शिवाय जुनागढच्या बंधाला तालुका पंचायत, जामनगरच्या बैराजा तालुका पंचायत, अमरेलीच्या धारी तालुका पंचायत, बांधेर तालुका पंचायत आणि सूरतच्या अम्बोली तालुका पंचायतमध्ये आपचे उमेदवार आघाडीवर आहेत.

एककीडे या निवडणुकांमध्ये भाजपची घोडदौड सुरू असतानाच आपनेही हातपाय पसरले आहेत. आतापर्यंत आपने जिल्हा परिषदेच्या 6, पंचायत समितीच्या 18 आणि नगरपालिकेच्या 22 अशा एकूण 46 जागांवर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे आप नगरपालिकेत 22 आणि तालुका पंचायतीच्या 18 जागांवर आघाडीवर आहे.

भाजपचं वर्चस्व कायम
भाजपने या निवडणुकांमध्ये गेल्या 30 वर्षांपासूनच आपले गड राखले आहेत. राजकोटमध्ये तालुका पंचायतीत भाजपने आतपार्यंत 18 तर काँग्रेसने 14 जागा जिंकल्या आहेत. भाजपने या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक बालेकिल्ल्यांनाही सुरुंग लावला आहे.

काँग्रेसला मोठं नुकसान
या निवडणुकीच्या निकालावरून आपमुळे काँग्रेसला मोठं नुकसान होताना दिसत आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागातही काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. साबरकांठा येथे काँग्रेस आमदार अश्विन कोटवाल यांचा मुलगा यश कोटवाल पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभूत झाला आहे. राज्यात 31 जिल्हा परिषदांमध्ये भाजप 20 ठिकाणी आघाडीवर आहे. आपमुळे काँग्रेसची सर्व राजकीय गणितं बिघडल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button