कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; राज्यात पुन्हा लॉकडाऊनचा इशारा

मुंबई : राज्यात बुधवारी दिवसभरात 4,787 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. मंगळवारी हा आकडा 3,663 एवढा होता. यामध्ये आज जवळपास 1100 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. 3,853 जण बरे झाले आहेत.
राज्यात एकूण 20,76,093 कोरोनाबाधित सापडले आहेत. यापैकी 19,85,261 बरे झाले आहेत. सध्या 38,013 रुग्ण उपचार घेत आहेत. मृतांचा आकडा 51,631 झाला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण उपचार घेत आहेत. अनुक्रमे 4530, 4681, 7509 रुग्ण आहेत. राज्यातील मृत्यूदर 2.49 टक्के एवढा आहे.
मुंबईत बुधवारी 721 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही सर्वाधिक वाढ आहे. 721 रुग्णांपैकी 82 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. त्यामुळे बरचेसे रुग्ण हे होमक्वॉरन्टीन आहेत. 98 टक्के वाढलेल्या केसेस या हायराईज सोसायटीमधील आहेत. झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या भागातून जास्त रुग्ण नाहीत.
उद्धव ठाकरे यांचा इशारा
– लग्नसमारंभ, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रमात आरोग्यविषयक नियम पाळले जात नसतील तर कारवाई होणार
– उपाहारगृह, हॉटेल्समध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास परवाना होऊ शकतो रद्द
– ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांचे परवाने रद्द होणार
– कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी आता पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल
– सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंचे पालन होत नसल्यास कारवाई होणार
कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यावेळी ठाकरे यांनी अनेक सूचना केल्या.